शिवरायांचे दूरदर्शी आणि महत्वाकांक्षी आरमार:

महाराष्ट्र मंडळ शिकागो – रचना मॅगझीन सुवर्णमहोत्सवी वर्ष गुढीपाडवा विशेषांकामध्ये प्रकाशित झालेला लेख

आरमार उभे करण्यामागची कारणे

भारतीय उपखंडामध्ये नौकानयन आणि समुद्री व्यापार भरभराटीला आलेला असताना सुद्धा अडीच हजार वर्षांमध्ये कोणत्याही राजाने किंवा सत्तेने समुद्रावर व समुद्रामार्गे होणाऱ्या व्यवहार, व्यापार व दळणवळणावर आपला हक्क दाखविला नव्हता. समुद्र हा सर्वांसाठी उपलब्ध असलेली सामुदायिक पायाभूत सुविधा याच दृष्टीने वापरला जात होता. समुद्राचे मालकी किंवा हक्क कोणाकडेही नव्हते किंवा कोणी त्यासाठी आपला हक्क सांगितला नव्हता.

पोर्तुगीज लोकांच्या येण्यामुळे मात्र या सर्वमान्य व्यवस्थेला समजुतीला तडा गेला. वास्को-द-गामा  कालिकत मध्ये आल्यानंतर आपल्या पहिल्याच भेटीमध्ये त्याने तेथील नियमानुसार आवश्यक असलेला कर भरण्यास नकार दिला. पोर्तुगीज लोकांच्या म्हणण्यानुसार समुद्रामध्ये प्रवास करायचा हक्क सर्वांना आहे आणि युरोपमध्ये ते तो मान्य सुद्धा करत परंतु युरोपच्या बाहेर मात्र पोर्तुगीज लोक हेच समुद्राचे बादशाह असल्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय दळणवळण व व्यापार करत असलेल्या सर्व जहाजांना साहित्यासहित जप्त करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. पोर्तुगीज लोकांच्या अशा आक्रमक भूमिकांमुळे त्या काळापर्यंत सलोख्याने चाललेल्या समुद्रावरील व्यापाऱ्यांवर अचानक मर्यादा आल्या. पोर्तुगीज लोक हे अत्याधुनिक जहाजे व हत्यारांसह युक्त असल्यामुळे त्यांना फारसा विरोध झाला नाही. पोर्तुगीजांनी बिनदिक्कतपणे आपले परवाने (Cartaz) विकून पैसे कमवावयास सुरुवात केली व संपूर्ण सागरी किनारपट्टीवर आपले राज्य प्रस्थापित केले. पोर्तुगीज लोकांनंतर आलेल्या डच, फ्रेंच आणि इंग्रजी लोकांनी सुद्धा त्यांचाच कित्ता गिरवायला सुरुवात केली.

कोकण प्रांत-विजय आणि आरमाराची निर्मिती

1656 मध्ये जावळी काबीज केल्यानंतर आणि उत्तर कोकणाची व्यवस्था लावल्यानंतर शिवाजी महाराजांनी 1661 ते 1663 मध्ये दक्षिण कोकणावर आपले लक्ष केंद्रित केले. हे सर्व घडत असतानाच शिवाजी महाराजांनी कल्याणच्या खाडीमध्ये आणि भिवंडी, पनवेल मध्ये 1657 नंतर आणि 1659 च्या आधी जहाजबांधणीचा श्रीगणेशा केला होता. पोर्तुगीजांच्या लक्षात हि गोष्ट आल्यानंतर त्यांनी आपल्या वसईच्या अधिकाऱ्यास शिवाजी महाराजांची जहाजे कोणत्याही परिस्थितीत समुद्रात उतरू नयेत याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते.

शिवाजी महाराजांनी आरमाराचे व सागरी व्यापाराचे महत्त्व पुरेपूर जाणले होते. सागरी व्यापाराशिवाय आरमार किंवा आरमाराशिवाय सागरी व्यापार या दोन्ही गोष्टी साध्य करणे अशक्य असल्याचे त्यांनी जाणले होते.

शिवाजी महाराजांनी तीन प्रकारचे किल्ले किंवा जलदुर्ग बांधले. त्यातला पहिला प्रकार हा समुद्रातील बेटांवर बांधलेले किल्ले (Island) हा होय. दुसरा प्रकारांमध्ये चिंचोळ्या किनारपट्टीवर समुद्रामध्ये आलेले सुळके ओळखून त्याचा वापर किल्ल्याच्या (Headland) स्वरूपात करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तिसऱ्या प्रकारचे किल्ले हे सागरी किनारापासून थोडे आत अशा भूभागावर (Inland) उभारलेले आहेत.

नाविक दलाची माहिती

सभासद बखरीनुसार शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये प्रत्येकी दोनशे जहाजांच्या अशा दोन स्क्वाड्रन तयार होत्या. आणि सर्व जहाजांची संख्या साधारणपणे सातशे होती.

चित्रगुप्तांच्या इतिहासानुसार या जहाजांची संख्या खालील प्रमाणे होती:

गुरब मोठे – 30

गुरब छोटे – 50

होडी – 160

गलबत – 100

तारू – 60

महागिर्‍या – 150

जग – 15

पाल – 25

मचवा – 50

या 640 जहाजांपैकी साधारण तीनशे जहाजे लढाईसाठी वापरली जात असत.

चित्रगुप्त इतिहासामध्ये याव्यतिरिक्त 1000 तारूचा उल्लेख आहे.

सभासद बखरीमध्ये या नौकांचे 6 प्रकार दिले आहेत:

  1. गुराब ( इंग्लिश मध्ये ग्राब)

सामान्यतः दोन शिडकाठी असलेल्या या जहाजांचे वजन शंभर टन होते. काही तीन शिडकाठी असलेल्या गुराबांचे वजन तीनशे टनापर्यंत होते.

  1. गलबत

आर ऑर्मेच्या दाखल्यानुसार गलबत म्हणजे दोन शिडकाठी असलेले साधारणपणे 70 टनांचे हाताने वल्हावयाचे जहाज होते. आर ऑर्मेच्या पुराव्यावरून ते जहाज एक किंवा दोन किलो गोळाफेक करणाऱ्या सहा ते आठ तोफा घेऊन जाऊ शकत असे. चाळीस ते पन्नास वल्हे असलेल्या या जहाजांचा वेग ताशी सहा ते सात किलोमीटर असे.

  1. शिबड

ही जहाजे स्पॅनिश हाफ गॅली प्रमाणे होती.

  1. तरांडे – हे मोठ्या आकाराचे जहाज होते
  2. तारु हे व्यापारी वापरत असत.
  3. पगर हे सुबक पडाव होते.

7-10. दुबारे, वभोर, तीरकाटी आणि पाल ही चार नावे चिटणीस आणि चंद्रगुप्त बखरीमध्ये आढळतात.

विजयदुर्ग पाल

पाश्चात्य तटावर खालील प्रकारच्या नौकांचा सामान्यपणे वापर होत होता..

  1. हिंदुस्तानी मच्छवा (मचवा) – हे एक तीनशे-चारशे किलोचे, एक शिडकाठी, 12 वल्हे आणि 4 तोफा असलेले जहाज होते.
  2. गॅलॉन्स ही मोठे जलवाहतुकीचे जहाज होती ज्यात पोर्तुगाल आणि पूर्वे दरम्यान समुद्रपर्यटन होत असे.

गॅली

  1. होडी या सामान्य नौका होत्या.
  2. महागिर्या हे 7 ते 50 टनापर्यंत वस्तू/माल वाहून नेणारे व्यापारी जहाज होते

महागिरी

जहाज बांधणी आणि व्यवस्थापन

जहाज बांधणी हा त्या काळातील कोकणातील एक मोठा उद्योग होता. वसईच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर टीक लाकूड उपलब्ध असल्यामुळे हा उद्योग भरभराटीस आला होता. वसईच्या बंदरांबरोबरच ठाणा, कल्याण, भिवंडी, अलिबाग, विजयदुर्ग आणि मालवण ही मराठ्यांचे महत्वाचे जहाजबांधणीचे ठिकाणे होती.

मराठा आरमाराची साधारण युद्धपद्धती

शिवाजी महाराजांनी इतरांच्या तुलनेत जाणून बुजून छोट्या आकाराची जहाजे बांधलेली असल्यामुळे त्यांना वाऱ्याची साथ असेल तर शिडकाठी वापरून किंवा वारा मदतीला नसेल तर हाताने वल्हवून शत्रूवर हल्ला किंवा पलायन करता येत असे. आपल्या गनिमी काव्याच्या धोरणाप्रमाणे शिवाजी महाराजांची जहाजे स्वतःला शत्रूच्या जहाजांच्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला वल्हवून जाऊन त्यांच्या माऱ्याच्या पल्याबाहेरून आक्रमण करत असत. शत्रूची जहाजे हालचालीसाठी पूर्णपणे वाऱ्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्याकडे प्रतिकार किंवा प्रतिहल्ला करण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध राहत नसे.

नैसर्गिक संपत्तीचा आणि परिस्थितीचा पुरेपूर फायदा शिवाजी महाराजांनी जमिनीवरील लढाईबरोबरच समुद्रावरील लढाईमध्येही घेतलेला दिसून येतो.


शिवाजी महाराजांच्या आरमाराचे यश

  1. कोकण काबीज केल्यानंतर त्यावर युरोपियन, मोगल किंवा सिद्धीकडून होऊ शकणाऱ्या हल्ल्यांना यशस्वीपणे पायबंद घालण्यासाठी व प्रसंगी हे हल्ले मोडून काढण्यासाठी आरमाराचा उपयोग झाला.
  2. आरमाराची ताकद आणि समुद्रमार्गे होत असलेला व्यापार यामुळे कोकण विभागातील समुद्रामध्ये सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी शिवाजी महाराजांना मदत झाली. यामुळे तेथे होत असलेला व्यापार, दळणवळण आणि इतर सर्व साधनसंपत्तीवर हक्क प्रस्थापित करण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना प्राप्त झाला.
  3. स्वतःची ताकद सिद्ध केल्यामुळे पोर्तुगीजांची समुद्रावरील सत्ता झुगारून देऊन व्यापार आणि दळणवळणासाठी त्यांचे परवाने घेण्याची गरज संपली. याउलट मराठा आरमार इतर जहाजांना आपले परवाने विकून एक मोठे आर्थिक पाठबळ निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.
  4. परकीय शत्रूंच्या समुद्रमार्गे होत असलेल्या हालचाली/व्यापार यावर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होऊ लागले.
  5. आपल्या सोयीनुसार पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच यांना आपापसात लढवण्यात किंवा त्यांचा वापर करून घेण्याची संधी प्राप्त झाली. आपले कर्तुत्व सिद्ध केल्यामुळे या लोकांना शिवाजी महाराजांना बरोबरीची वागणूक द्यावी द्यावी लागली याचा फायदा वाटाघाटी व इतर करार करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाला.
  6. आरमारातील सर्व कामासाठी खूप मोठ्या प्रमाणावर लोकांची नेमणूक केल्यामुळे नवीन उद्योग आणि रोजगार निर्मितीस चालना मिळाली.
  7. इतर मोहिमांमध्ये नाविकदलाचे सहकार्य व मदत मिळू लागली. सुरतची लूट किंवा बसरुरची लूट करताना आरमाराने खूप मोठी भूमिका बजावली आहे.
  8. सुरतेच्या लुटीचे वेळी व इतर ठिकाणी औरंगजेब मक्केला पाठवत असलेल्या भाविकांच्या जहाजांना लुटण्यासाठी तसेच जीवळ, पाबळ आणि सुरत शेजारील इतर किल्ले लुटण्यासाठी आरमाराचा वापर झाला.
  9. खांदेरी बेट ताब्यात घेण्यात आणि ते स्वतःकडे ठेवण्यासाठी आरमाराला बलाढ्य अशा इंग्रज आणि सिद्धी त्यांच्या समुद्री ताकदीशी झुंज देण्याचे सामर्थ्य मिळाले.
  10. जंजिर्‍याच्या सिद्दिने कोकणामध्ये घातलेले बेबंद थैमान व अराजक नियंत्रणात आणण्यासाठी व त्याच्यावर वचक बसवण्यासाठी महाराजांच्या आरमाराचा खूप मोठा वापर झाला.
  11. मराठ्यांच्या मनात आपणही समुद्रावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करू शकतो आणि बलाढ्य युरोपियन ताकदीशी दोन हात करू शकतो याचा प्रचंड आत्मविश्वास मनात निर्माण झाला. या मजबूत उभारणीवरच पुढे कान्होजी आंग्रे आणि आनंदराव धुळप यासारख्या पराक्रमी सेनानींनी बलाढ्य इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.
  12. शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याच्या योजनेनुसार त्यांनी जे 2 संरक्षणार्थ तट निर्माण केले होते त्यापैकी पश्चिम किनारपट्टीवरील आरमार हा एक होय. दुसरा तट म्हणजे दक्षिण दिग्विजय करून जिंकलेली रायगड ते जिंजीपर्यंतची अभेद्य भिंत होय. पुढे याच अभेद्य भिंतीचा फायदा राजाराम महाराजांना खूप मोठ्या प्रमाणावर झाला.
  13. शिवाजी महाराजांना पश्चिम किनाऱ्यावर संकटकाळी आसरा घेण्यासाठी तसेच इतर रसद व साधन-सामुग्रीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तयारी करावयाची होती. स्वराज्याच्या तिन्ही बाजूंनी जर सर्व शत्रूंनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांची कोंडी केली असती तर कोकण आणि आरमार याच्या जीवावर त्या सर्वांचा मुकाबला करण्याच्या मनसुबा महाराजांनी केला होता.

अशा रीतीने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मोहिमेचा सागरी आरमार हा एक अतिशय महत्त्वाचा आणि अविभाज्य अंग बनला होता. 1680 मध्ये वयाच्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या शिवाजी महाराजांच्या अकाली निधनामुळे त्यांचे स्वराज्याचे पूर्ण स्वप्न काय होते याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो..