महाराष्ट्र मंडळ शिकागो – रचना मॅगझीन सुवर्णमहोत्सवी वर्ष गुढीपाडवा विशेषांकामध्ये प्रकाशित झालेला लेख
भारतीय उपखंडामध्ये नौकानयन आणि समुद्री व्यापार भरभराटीला आलेला असताना सुद्धा अडीच हजार वर्षांमध्ये कोणत्याही राजाने किंवा सत्तेने समुद्रावर व समुद्रामार्गे होणाऱ्या व्यवहार, व्यापार व दळणवळणावर आपला हक्क दाखविला नव्हता. समुद्र हा सर्वांसाठी उपलब्ध असलेली सामुदायिक पायाभूत सुविधा याच दृष्टीने वापरला जात होता. समुद्राचे मालकी किंवा हक्क कोणाकडेही नव्हते किंवा कोणी त्यासाठी आपला हक्क सांगितला नव्हता.
पोर्तुगीज लोकांच्या येण्यामुळे मात्र या सर्वमान्य व्यवस्थेला समजुतीला तडा गेला. वास्को-द-गामा कालिकत मध्ये आल्यानंतर आपल्या पहिल्याच भेटीमध्ये त्याने तेथील नियमानुसार आवश्यक असलेला कर भरण्यास नकार दिला. पोर्तुगीज लोकांच्या म्हणण्यानुसार समुद्रामध्ये प्रवास करायचा हक्क सर्वांना आहे आणि युरोपमध्ये ते तो मान्य सुद्धा करत परंतु युरोपच्या बाहेर मात्र पोर्तुगीज लोक हेच समुद्राचे बादशाह असल्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय दळणवळण व व्यापार करत असलेल्या सर्व जहाजांना साहित्यासहित जप्त करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. पोर्तुगीज लोकांच्या अशा आक्रमक भूमिकांमुळे त्या काळापर्यंत सलोख्याने चाललेल्या समुद्रावरील व्यापाऱ्यांवर अचानक मर्यादा आल्या. पोर्तुगीज लोक हे अत्याधुनिक जहाजे व हत्यारांसह युक्त असल्यामुळे त्यांना फारसा विरोध झाला नाही. पोर्तुगीजांनी बिनदिक्कतपणे आपले परवाने (Cartaz) विकून पैसे कमवावयास सुरुवात केली व संपूर्ण सागरी किनारपट्टीवर आपले राज्य प्रस्थापित केले. पोर्तुगीज लोकांनंतर आलेल्या डच, फ्रेंच आणि इंग्रजी लोकांनी सुद्धा त्यांचाच कित्ता गिरवायला सुरुवात केली.
1656 मध्ये जावळी काबीज केल्यानंतर आणि उत्तर कोकणाची व्यवस्था लावल्यानंतर शिवाजी महाराजांनी 1661 ते 1663 मध्ये दक्षिण कोकणावर आपले लक्ष केंद्रित केले. हे सर्व घडत असतानाच शिवाजी महाराजांनी कल्याणच्या खाडीमध्ये आणि भिवंडी, पनवेल मध्ये 1657 नंतर आणि 1659 च्या आधी जहाजबांधणीचा श्रीगणेशा केला होता. पोर्तुगीजांच्या लक्षात हि गोष्ट आल्यानंतर त्यांनी आपल्या वसईच्या अधिकाऱ्यास शिवाजी महाराजांची जहाजे कोणत्याही परिस्थितीत समुद्रात उतरू नयेत याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते.
शिवाजी महाराजांनी आरमाराचे व सागरी व्यापाराचे महत्त्व पुरेपूर जाणले होते. सागरी व्यापाराशिवाय आरमार किंवा आरमाराशिवाय सागरी व्यापार या दोन्ही गोष्टी साध्य करणे अशक्य असल्याचे त्यांनी जाणले होते.
शिवाजी महाराजांनी तीन प्रकारचे किल्ले किंवा जलदुर्ग बांधले. त्यातला पहिला प्रकार हा समुद्रातील बेटांवर बांधलेले किल्ले (Island) हा होय. दुसरा प्रकारांमध्ये चिंचोळ्या किनारपट्टीवर समुद्रामध्ये आलेले सुळके ओळखून त्याचा वापर किल्ल्याच्या (Headland) स्वरूपात करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तिसऱ्या प्रकारचे किल्ले हे सागरी किनारापासून थोडे आत अशा भूभागावर (Inland) उभारलेले आहेत.
सभासद बखरीनुसार शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये प्रत्येकी दोनशे जहाजांच्या अशा दोन स्क्वाड्रन तयार होत्या. आणि सर्व जहाजांची संख्या साधारणपणे सातशे होती.
चित्रगुप्तांच्या इतिहासानुसार या जहाजांची संख्या खालील प्रमाणे होती:
गुरब मोठे – 30
गुरब छोटे – 50
होडी – 160
गलबत – 100
तारू – 60
महागिर्या – 150
जग – 15
पाल – 25
मचवा – 50
या 640 जहाजांपैकी साधारण तीनशे जहाजे लढाईसाठी वापरली जात असत.
चित्रगुप्त इतिहासामध्ये याव्यतिरिक्त 1000 तारूचा उल्लेख आहे.
सभासद बखरीमध्ये या नौकांचे 6 प्रकार दिले आहेत:
सामान्यतः दोन शिडकाठी असलेल्या या जहाजांचे वजन शंभर टन होते. काही तीन शिडकाठी असलेल्या गुराबांचे वजन तीनशे टनापर्यंत होते.
आर ऑर्मेच्या दाखल्यानुसार गलबत म्हणजे दोन शिडकाठी असलेले साधारणपणे 70 टनांचे हाताने वल्हावयाचे जहाज होते. आर ऑर्मेच्या पुराव्यावरून ते जहाज एक किंवा दोन किलो गोळाफेक करणाऱ्या सहा ते आठ तोफा घेऊन जाऊ शकत असे. चाळीस ते पन्नास वल्हे असलेल्या या जहाजांचा वेग ताशी सहा ते सात किलोमीटर असे.
ही जहाजे स्पॅनिश हाफ गॅली प्रमाणे होती.
7-10. दुबारे, वभोर, तीरकाटी आणि पाल ही चार नावे चिटणीस आणि चंद्रगुप्त बखरीमध्ये आढळतात.
विजयदुर्ग पाल
पाश्चात्य तटावर खालील प्रकारच्या नौकांचा सामान्यपणे वापर होत होता..
गॅली
महागिरी
जहाज बांधणी हा त्या काळातील कोकणातील एक मोठा उद्योग होता. वसईच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर टीक लाकूड उपलब्ध असल्यामुळे हा उद्योग भरभराटीस आला होता. वसईच्या बंदरांबरोबरच ठाणा, कल्याण, भिवंडी, अलिबाग, विजयदुर्ग आणि मालवण ही मराठ्यांचे महत्वाचे जहाजबांधणीचे ठिकाणे होती.
शिवाजी महाराजांनी इतरांच्या तुलनेत जाणून बुजून छोट्या आकाराची जहाजे बांधलेली असल्यामुळे त्यांना वाऱ्याची साथ असेल तर शिडकाठी वापरून किंवा वारा मदतीला नसेल तर हाताने वल्हवून शत्रूवर हल्ला किंवा पलायन करता येत असे. आपल्या गनिमी काव्याच्या धोरणाप्रमाणे शिवाजी महाराजांची जहाजे स्वतःला शत्रूच्या जहाजांच्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला वल्हवून जाऊन त्यांच्या माऱ्याच्या पल्याबाहेरून आक्रमण करत असत. शत्रूची जहाजे हालचालीसाठी पूर्णपणे वाऱ्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्याकडे प्रतिकार किंवा प्रतिहल्ला करण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध राहत नसे.
नैसर्गिक संपत्तीचा आणि परिस्थितीचा पुरेपूर फायदा शिवाजी महाराजांनी जमिनीवरील लढाईबरोबरच समुद्रावरील लढाईमध्येही घेतलेला दिसून येतो.
अशा रीतीने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मोहिमेचा सागरी आरमार हा एक अतिशय महत्त्वाचा आणि अविभाज्य अंग बनला होता. 1680 मध्ये वयाच्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या शिवाजी महाराजांच्या अकाली निधनामुळे त्यांचे स्वराज्याचे पूर्ण स्वप्न काय होते याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो..